इरशाळगड-शिवाजी शिडीने माथेरान

1 comment:
पुन्हा एकदा कर्जतचं बसस्थानक. इंद्रा आणि अतल्या पडल्या पडल्या झोपेच्या अधीन झालेले. मी आणि सागरला झोप येत नव्हती कि मच्छरांची लागवड जास्त प्रमाणात झाली होती,हे कळायला मार्ग नव्हता. कर्जतला पावसाळ्यात रात्रीचं कधी राहिलो नसल्यामुळे,या उपद्रवाची कल्पनाच नव्हती. येथे डासांनी भयानक तांडव माजवले असताना या दोघांना झोप कशी लागत होती ? आणि वरून हा सागर पेटला होता,हे मनोरेचं कार्ट मोबाईल वर चित्र-विचित्र गाणे लावून एकटाच नाचायला  लागलं होतं. काय कळेना ! हा सर्व कार्यक्रम चालू असताना जरा थोडा वेळ डोळा लागला तर बसस्थानकवरच्या गर्दीच्या किलबिलाटानी जाग आली. सकाळचे साडेचार -पाच झाले असावेत. बसस्थानक ट्रेकर/पिक्नीकर लोकांनी भरून गेलं. कुणी भीमाशंकर,कुणी पेबचा किल्ला,कुणी माथेरान,असंच काही बाही. आम्ही पनवेलला जाणाऱ्या पहिल्या बसची वाट पाहत थांबलो. 


नशा. व्यसन म्हणा हवं तर. नशा हा शब्द जरा त्यातला वाटतो. महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला लागलेलं सह्याद्री नावाचं व्यसन. आणि माणूस एकदा सह्याद्रीच्या वाटेला लागला की ही वाट सुटणे अशक्य. शिवाय हे व्यसन कधीही सुटू नये ही आम्हा जातिवंत भटक्यांची मनस्वी इच्छा. पोर सुखरूप घरी येऊ दे ही आमच्या आईवडिलांची देवाकडून माफक अपेक्षा! पण आईबाबा तुम्ही काळजी करू नका. तुमचं पोर कधीच आगाऊ धाडस करणार नाही. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद द्या. बास ! 

अशाच व्यसनान्ध आम्हा भटक्यांचे पाय आम्हाला घरात स्वस्थ बसू देईनात. तरी बरं या पावसात प्रत्येक आठवड्याअंती आमच्या चार मोहिम पार पडल्या होत्या. पण व्यसनच ते. आम्हाला घरातून बाहेर पडणं भागच होतं. रद्द होता होता सागर,अतुल, इंद्रा आणि मी अशी चांडाळ चौकडी तयार झाली. बेत पक्का झाला.  शिवाजी शिडीने माथेरान गाठायचं. 

कोंकण. कोंकण म्हणजे रायगडाची सोपी चढाई करताना चांगल्या ट्रेकरची धांदल उडवणारं दमट वातावरण. कोंकण म्हणजे हरिहरेश्वर सारख्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावरचा सांजवेळ गारवा. कोंकण म्हणजे रायगडावरील महादारवाज्याची प्रतीकृती असणारया सुधागडावरील दरवाज्याबद्दलची कुतूहलता. कोंकण म्हणजे महाराजांनी हेरलेले सागरी आरमाराचे महत्व. कोंकण म्हणजे महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या सिंधुदुर्गाचा प्रदेश. कोंकण म्हणजे सह्यापर्वताची मुख्य रांग कापत,घाटमाथ्यावरून उतरत घाटाने अथवा कुठल्याशा नाळेने गाठण्याचे अचाट वेड. 

याच कोंकणात सह्याद्रीच्या पोटात असलेल्या एका डोंगरावर कुणा एका गोऱ्या साहेबाने म्हणे खूप वर्षाआधी विकास करून ठेवलाय. तेच आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक…. माथेरान, म्हणजेच माथ्यावर रान असलेला डोंगर. पण माथा गाठायचा आडवाटेने. डोंगरातील पायवाटेने.

पावणे सहाला बस आली,अर्ध्या तासात चौकला पोहोचलो . एकाला इरशाळवाडीची वाट विचारून उदरभरणाचा कार्यक्रम आटोपला आणि इरशाळ वाडीकडे चालायला सुरुवात केली. रात्री मुसळधार पावसाने हजेरी दिल्यासारखं,सकाळचं वातावरण मन प्रसन्न करून गेलं. रेल्वे रूळ ओलांडून गाडी रस्त्याला लागलो. येथूनच मोरबे धरणाची भिंत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला धुक्यात हरवलेला इरशाळगडाचा उतुंग आणि अवघड असा सुळका,यांचे दर्शन झाले. मघाच्या उदरमभरणं या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अर्थातच नैसर्गिक कौल! इंद्राने पुढाकार घेतला. आणि नेहमीप्रमाणे अविस्मरणीय क्षण टिपण्यात सागर मश्गुल असल्यासारखं दुरून दिसलं. पण इंद्रा पत्ता लागु देतो व्हय? सागरनी यशस्वी माघार घेतली. तिकडी जेथून इरशाळ वाडीची पायवाट सुरु होते तिथे येउन थांबली. गाडीरस्ता संपणार होता. इंद्रा कौल देऊन परतला. गाडीरस्ता सोडून डाव्या बाजूने असलेल्या चिखलातून चालायला सुरुवात केली. आणि ज्याची दाट भीती होती तेच झालं. मनोरेचं कार्ट भूंकलं,"आपल्याला इरशाळ गड करायचाय, आता इरशाळ गड उतरूनच माथेरान गाठू ". हे प्लान मध्ये नव्हतं. आता एक म्हणजे हे कार्ट ऐकणारं नव्हतं आणि दुसरं आम्हाला पण इरशाळ गडाचा सुळका खुणावत होताच. होकार द्यायला पर्याय नव्हता. ठरलं आधी मोहीम इरशाळगडाची. 


इरशाळ वाडीच्या वाटेला लागलो तोच,आजूबाजूच्या पाड्यातून बायाबापडे डोकावत होती. सगळ्यांची सकाळची कामे चाललेली. उजव्या बाजूला मोरबे धरणाचं पाणी आणि वाटेचा भाग सोडला तर दोन्ही बाजुनी हिरव्या आणि पोपटी रंगानी लगडलेली जमीन. हे बघून एकदम सुधगडाची आठवण झाली आणि चालण्याचा हुरूप अजून वाढला. पुढे जातो न जातो तोच समोरून एक माणूस येताना दिसला. त्याला वारोसेची वाट विचारली. त्याने "अक्ख्या गावाचे भौगोलिक स्थानंच बदलले आहे" असे सांगत "पुढे गेल्यावर ठाकरवाडी विचारा" असे सुचवले. बरं. बोलण्या बोलण्यात हा गावातला मुख्य माणूस आहे आणि गड त्याच्या देखरेखीखाली आहे असे कळले. 


मागल्या वेळेस प्रबळगडावरच्या काळ बुरुजावरून इर्शालगडाचे थक्क करणारे दर्शन अजूनही आठवत होते. बरेचदा पनवेल रस्त्यावरून खुणावणारा इरशाळगडचा उत्तुंग सुळका. कदाचित याहीवेळी सुळका चढणे शक्य नसले तरी जवळून बघण्याची संधी योगायोगाने आली होती. त्यामुळे पाय रपरप वाडीकडे झेपावत होते. अधून मधून पाऊस-धुके यामुळे वातावरण जरी आल्हाददायक वाटत असले तरी समुद्रसपाटी जवळ असल्यामुळे दमट. जर कुठे पाऊस बंद पडला की गरम व्हायला सुरुवात. पहिल्या दमाच्या ओघात सागरया आणि इंद्रा मागे पडले होते. अतुल आणि मी पुढे,एकमेकांशी काहीच न बोलता धुक्यांमधूनफक्त शांततेचा आनंद घेत होतो. तेवढ्यात दरीत काहीतरी धरपकड झाली. कोणीतरी जनावर किंचाळण्याचा आवाज आला. शांततेचा भंग. "दोन माकडाचं काहीतरी चाललंय" इति अतुल.


बऱ्यापैकी उंचीवर आलो होतो. धरणाच्या विहंगम दृश्याने मन वेडावले. वरून दोघे-तिघे जण उतरताना दिसले. बहुतेक गावठी कट्टा वाहत होते. विचारून खात्री करून घेतली,तेवढीच आपली माहितीत भर! धुक्यामुळे अजूनही सुळका स्पष्ट दिसत नव्हता.

गावकऱ्यांकडून वाटनिश्चिती करून चालायला लागलो. थोड्याच वेळात पठारावर भातचीखलाने आमचे स्वागत केले. दूरवर कुठेतरी पिवळ्या-विटकरी रंगाचं बांधकाम दिसलं,बहुदा शाळा असावी. वाडीत पोहोचल्याची खात्री पटली. भातचीखलाच्या वाफ्यामधले स्वच्छ नितळ पाणी तोंडावर शिंपडून पुढे निघालो आणि वाडीत प्रवेश केला . वस्तीतल्या मावशिबायला रस्ता विचारत सुळक्याकडे निघालो थोडं पुढे चालत गेलो की सुळक्याच्या पायथ्याशी एक छोटं देउळ लागतं. छोट्या धबधब्याजवळ डोंगर कातळातल्या नितळ पाण्याने बाटल्या भरून घेतल्या. तेवढ्यात पावसाची रिप रिप सुरु झाली. सुळक्याच्या अगदी जवळ एका भल्यामोठ्या दगडावर आम्ही आमचा पार्श्वभाग टेकवला. आमच्याआधीच इंद्रा तिथे पोहोचला होता. कुठलातरी शोर्टकट त्याने मारला,असं काहीतरी सांगत होता. आणि वरून ओरडत होता,"अरे लवकर या,पटकन या ". बहुतेक त्याला धुक्यामध्ये हर्षवायू झाला असावा नाहीतर नेहमीप्रमाणे काहीतरी "एक नंबर " दिसलं असावं. आम्ही पोहोचलो तर दृश्य खरोखरीच एक नंबर होतं. प्रबळ माथ्याकडे जाणारी डोंगररांग,मोरबे धरणाचं अधिक उंचावरून दिसणारं पाणी,पनवेल शहर. अर्थात त्यासाठी धुकं विरळ होण्याची वाट पहावी लागत होतीच.

भलामोठा दगड चढून आम्ही एकदम सुळक्याच्या पुढ्यात येउन ठाकलो.याच्यापुढे जाणे आता शक्य नव्हते. एकतर आम्ही बहुतेक मागच्या बाजूने सुळक्याजवळ पोहोचलो होतो. येथून वाट बिकट होती. त्याला वाट म्हणणे सुद्धा अयोग्य. दोन्ही बाजूनी खोल खोल दरी. धुकं असल्यामुळे दरीची भीषणता जाणवत नव्हती. आणि तेवढ्यात धुक्याने रहस्य उलगडावं तसं विरळ होउन आमच्या नजरांना वाट करून दिली, डोळ्यासमोर उभा केला साक्षात इरशाळगडाचा उत्तुंग सुळका,सरळसोट एकदम आकाशाला भिडणारा. डोळ्याचे पारणे फिटले,वाह ,क्या बात !





इरशाळगड:
समुद्रसपाटी पासून जवळपास १५०० फुट उंच . हा गड नव्हे. या गडाला फारसा इतिहास नसावा,कारण उल्लेख कुठेही नाही. गडावर पाहण्यासारखे विशाळादेवीचे मंदिर,टाक्या आणि नेढे. टाक्याच्या अस्तित्वामुळे गडाचा उपयोग कदाचित टेहेळणी बुरुज म्हणून झाला असावा.माथ्यावरून माणिकगड,प्रबळगड,कर्नाळा ,मलंगगड,चंदेरी,माथेरान या कोंकण सख्यांची भेट होते.नेढ्यापर्यंत शिडीने सहज पोहोचता येतं,सुळक्यावर जायचे असेल प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. राहण्यास शाळा योग्य,जेवणाची व्यवस्था आपणच करायची. 

सभोवतालचे निसर्ग रम्य दृश्य न्याहाळून आम्ही माथा उतरायला सुरुवात केली. इरशाळ वाडीकडे उतरताना पावसाची एक जोरदार सर कोसळून गेली. पाऊस हा नेमका उतरताना का कोसळतो हे मला अजून न सुटलेलं कोडं आहे ………… 



गड आला पण सिंह गेला ...............!

2 comments:

गड आला पण सिंह गेला ...............!


हे वाक्य सर्व महाराष्ट्रियानी एकदा तरी ऐकलेच  असेल… (नसेल ऐकले तर  पुढे वाचू  नका ............. :) )

सिंहगड वाचावताना  तानाजी मालुसरेंचा मृत्यु  झाला  हे ऐकल्यावर शिवाजी महाराजांच्या तोंडी आलेले हे वाक्य ..

सुट्टीच्या  लोह्गड  चा बेत फसल्यावर सिंहगड ला जायचे ठरले .  बाहेर छान पाउस  पडत होताच ..
सिंहगड ला जाणे  सर्वात सोपे असावे  , बस  , जीप , इत्यादी बरेच मार्ग आहेत .

चढायच असल्यास मार्ग दूसरा आहे ..साधारण ४५ मिनट मधे आपण हा गड  चढू शकतो शकतो (सरासरी)

 गडावर अजुन पाय ठेवतोच तोवर घरून फ़ोन .. वर्तमान पत्रा  मधे बातमी आली आहे ..एक मुलगी फोटो काढ़ायसाठी  पोज  देताना धुक्याचा अंदाज न आल्यामुळे खोल दरीत पडली ...शोध पथक  शोध घेत आहेत .. नागरिकाना  जपून  फिरण्याचे  आवाहन .

आम्हाला समजुन चुकले की घरी जाईपर्यन्त सिंहगड आणि आजकालच्या पीढ़ी चे  ऐकून न घेण्याची तयारी  यावर चर्चासत्र(?) चालू राहणार :) :)

असो ..............

सिंहगड म्हणजेच आपला कोंढ़ाणा ..

पूर्वी अदीलशाही मधे असलेला हा किल्ला सुभेदार म्हणून असलेल्या दादाजी कोंड देवांच्या  ताब्यात होता ..त्यांच्या  मृत्यु नंतर किल्ल्याच्या किल्लेदार सिद्धि  अम्बर याला लाच देऊन शिवाजी महाराजानी स्वराज्यात आणला  व  आपले लश्करी केंद्र बनवले ..

पण इ स  १६४९  मधे शहाजी राजांच्या सुटकेसाठी  त्याना तो परत अदीलशहा ला द्यावा लागला ..

सिंहगड प्रसिद्ध अहे तो मुख्यत्वे तानाजी मालुसरेंच्या बलिदाना साठी ..महाराज जेव्हा  आग्र्या वरून परत आले  तेव्हा त्यानी सर्व किल्ले परत ताब्यात घेण्यास सुरुवात केली  तेव्हा तानाजी ने त्याना कोंढाणा मिल्वुन द्यायचे कबुल केले.

कबुल केल्याप्रमाणे त्यानी गड़ मिळवून  दिला पण त्यांचा मृत्यु झाला ....

हा   झाला पुर्वीचा सिंहगड .... सध्याच्या सिन्ह्गडा कड़े कोणी ऐतिहासिक स्थळ  म्हणून पाहत नाही .. full commercial ......anyways...

ही झाली ऐतिहासिक बाजु ..

सध्याचा सिंहगड : - १ ५  ऑगस्त २००८    पासून  आसपास टोल  घ्यायला सरकार ने सुरुवात केली . २०१० पर्यन्त तरी गडावर कहिहि  सुधारणा दिसली नाही  ,..( जमा रक्कम : ६५  लक्ष )
पावसाळ्या  मधे सिंहगड म्हणजे एक refreshment.,.....................must go once in an year during mansoon /heavy rain :)
गडाला   २ दरवाजे आहेत .. एक आहे कल्याण दरवाजा  आणि एक पुणे दरवाजा ..




 

  

   गडावरील पाहण्याची ठिकाणे :
 
  दारूचे कोठार :- दरवाज्यातून आतमधे  प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची दगडी ईमारत म्हणजेच दारूचे                               कोठार .
  देव  टाक्या : तानाजी स्मारकाच्या मागे डाव्या एक छोटा तलाव आहे ..त्याच्या डाव्या बाजूला गेल्यास          देव टाक्या दिसतील  
   कोंढाणे श्वर मंदिर :  शंकराचे प्राचीन मंदिर।
 
 अमृतेश्वर भैरव मंदिर : भैरव व भैरवी च्या मुर्त्या आहेत ..

खालील फोटो २ वेगळ्या ट्रेक मधे घेतलेले आहेत :)


दुरचित्र वाणी चा प्रसिद्ध खाम्ब



 
 
 






दरवाजा ...........






सिंहगड मान्सून  मधे ......



 



वरील  फोटोची उन्हाळी आवृत्ती  :) :)







राज सिनेमा मधील दृश्य वाटत आहे :)






तानाजी  मालुसरे स्मारक 


 





खाण्याची व्यवस्था :  या बाबतीत सिन्ह्गडाचा  हात कुठलाच गड धरु शकणार नाही ...
गरम गरम पिठले भाकरी , कांदा भजी अणि मडक्यातले दही ...........बरेच लोक केवळ  हे खाण्यासाठी सुद्धा सिन्हगडाला  आवर्जुन भेट देतात .....






 त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात  एकदा तरी सिंहगडाला  नक्की भेट द्यावी :) :) :)



हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा

1 comment:
समुद्रसपाटीपासून तब्बल 3२०० फूट उंचावर. जवळपास १ किमी खोलीची नाळ पार करून आम्ही खिंडीत पोहोचलो होतो. बेलपाडा गावातुन निघाल्यापासून वारं काय हे विसरलो होतो. दोन्ही बाजूंनी उंचच उंच कडे असल्यामुळे वाऱ्याचा पत्ताच नव्हता. पाय पुरते थकलेले. तहान-भूक सपाटून लागलेली. पण चालणे भाग होते. नळीची वाट संपली होती. आता एका छोट्याश्या घाटवाटेतून वर चढायचे होते.७००-८ ०० फुटाची चढाई अजुन बाकी होती.थोडा वेळ थांबुन चढायला सुरुवात केली. दाट झाडीतुन वाट काढत एका मोठ्या आणि अखंड खडकाजवळ पोहोचलो. तो खडक सहज पार करून वर चढलो तर कलाडगडाचे आणि प्रचंड नाफ्त्याचे सुंदर व विहंगम दृश्य आमची वाट पाहत होते. नाफ्त्याच्या नेढयाने लक्ष वेधून घेतले. ऊन वाढत चालले होते.उन्हाचे चटके अंगावर घेण्यापेक्षा आम्ही लगेच झाडीत शिरलो. येथुन जवळपास अर्धा तास लागणार होता कोंकण कड्या पर्यंत पोहोचायला.

घाटातला शेवटचा रॉक प्याच चढून आम्ही हरिशचंद्र गडाच्या पठारावर पोहोचलो आणि निसर्गानी आमची घनचक्कर,कात्राबाई ,आजोबा गड,कलाडगड,इत्यादी दुर्ग सख्यांची भेट घालवून दिली. भर उन्हात चालताना या दुर्गा रत्नांची भेट म्हणजे नळीच्या वाटेने आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. भुकेमुळे पोटात कावळे जरी ओरडत असले तरी तेथून पाय काढावासा वाटत नव्हता. पण कोंकण कड्याच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. चालायला लागलो कोंकण कड्याकडे.


कोंकण कडा .निसर्गाची एक अफलातून किमया. लहान-थोरांचे, प्रत्येकाचे म्हणजे ज्यांना कमीत कमी माहिती आहे अशांना एक जबरदस्त आकर्षण असलेला सह्यपर्वतामधला भव्यदिव्य कातळकडा.इथे येणाऱ्या प्रत्येकाला "निसर्ग आपल्याशी बोलतो" असा अनुभव देणारा.जवळपास अर्धा किमी परिघाचा अंतर्वक्र कडा.नळीच्या वाटेतुन आल्यामुळे त्याचे हे वेगळेच भन्नाट रूप आम्ही अनुभवत होतो. इंद्रानी तर पुढे  कड्यासमोर जाऊन बैठकच मांडली. अक्षरशः तहान-भुक विसरून आम्ही कड्याचे हे अजब रूप न्याहाळत बसलो होतो.दक्षिणेकडे भैरव गडाची कातळ भिंत महाकाय कोंकण कड्याच्या समोर केवढी छोटी भासत होती. सिंडोळा किल्ला,नानाचा अंगठा लक्ष वेधुन घेत होते. नळीच्या वाटेतून उंचच उंच दिसणारे रोहीदासाचे शिखर आता आमच्या बरोबरीचे वाटत होते.  उठावसं वाटत नव्हतं. पण पोटात कावळ्यांनी आता  ओरडण्याबरोबर थैमान घालायला  सुरवात केली होती. भास्करला जेवणाचं आधीच सांगितलं असल्यामुळे निश्चिंत होतो.

कोंकण कड्यावर पोहोचलो. शरीर चांगलंच थकलं होतं. पण कड्यावरच्या गार वारयानी थकवा थोडासा दूर झाला होता. सर्वात आधी पाण्याची तहान भागवली आणि लिंबू सरबताचे दोन-तीन ग्लास रिचवून हुशार झालो.तंबू ठोकायला सुरवात केली.आमचा छोटासा आशियाना सज्ज झाला आणि जेवण पण तयार होते. पिठलं-भाकरी वर यथेच्छ ताव मारून पोटभर जेवण उरकलं. वामकुक्षी म्हणून दिली ताणुन. इंद्रा आणि निखिल तर मेल्यासारखे झोपले होते. तिकडीच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. माझा तर मागच्या दोन वर्षापासुनचा स्वप्नवत ट्रेक पूर्ण झाला होता. 





एकदम सुर्यास्तालाच जाग आली. कोंकण कड्यावर आता नेहमीप्रमाणे सुर्यास्ताचा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.आलेले सहलीकर आपापल्या परीने चित्रविचित्र पोज देऊन फोटो काढण्यात दंग होते. पण आम्हाला यात काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे एका जागी जाऊन बसलो.निसर्गाचा विलक्षण सोहळा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप दिवसांनी कोंकण कड्याशी आम्हा भटक्यांच्या निवांत गप्पा रंगल्या होत्या.खरच आम्ही आज भारावलो होतो.शेवटी सुर्यनारायणानी निरोप घेतला आणि आम्ही आमच्या तंबुत परतलो. 


Maggie !!!! रात्रीच्या जेवणाचा बेत. सरपण गोळा झाले. थोड्याच वेळात गरमागरम maggie तयार झाली. पोटभर हादडली. गप्पा मारता मारता कधी झोपेच्या अधीन झालो कळालेच नाही. 



सकाळी जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. बापरे केवढी ती झोप. म्हणजे ट्रेकला एवढं निवांत आम्ही कधीच नव्हतो. सकाळची आन्हिक उरकताना इंद्राच्या दातघासनीच अजब कौतिक,"म्हणे मी घाबरलो नळीच्या वाटेला!" :) पटापट आवरलं. कोंकण कड्याचा निरोप घेतला. परत भेटण्याचे वचन देऊन खिरेश्वर मार्गे परतीचा प्रवास सुरु झाला.   

 
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. 
संदिप