कोलाबा(कुलाबा) अलिबाग …

2 comments:
समुद्रामधल्या गडांचे कुतूहल नेहमीच आपल्याला असते . असाच एक समुद्रातला गड म्हणजे कोलाबा(कुलाबा).
अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण  १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.
सकाळी भरती च्या वेळी किल्ल्यावर जायचं असल्यास बोट शिवाय पर्याय नाही .





किल्ला :-


किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही समुद्राचा आनंद लुटण्याचे ठरवले :)






 समुद्रात मनसोक्त डुंबून झाल्यावर ओहोटी च्या वेळी आम्ही किल्ल्यावर जायचे ठरवले … तेव्हा ओहोटी मुळे
चालत जाणे  शक्य होते . 




इसवी सन १६८०  मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या बोटींवर हल्ला करण्यासाठी या किल्ल्याच्या मुख्यत्वे उपयोग होत असे.  


कालांतराने हा किल्ला कान्होजी आन्ग्रेंच्या ताब्यात आला. काही काळ त्यांच्या परिवाराच्या ताब्यात राहिल्यानंतर किल्ल्यावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. 

ताज्या पाण्याची विहीर या किल्ल्यामध्ये अजून आहे . काही स्थानिक लोकांनी तिथे लोकांना जेवण उपलब्ध व्हावे म्हणून स्वयंपाका ची व्यवस्था केली आहे . त्यासाठी सुद्धा हे लोक विहिरीचे पाणी वापरतात. 

  

किल्ल्यावर बरीच मंदिरे आहेत ,भवानी आई मंदिर, पद्मावती मंदिर , महादेव मंदिर, गुलाबी मंदिर , बोपदेव मंदिर ,  त्यातील मुख्यत्वे सिद्धीविनायकचे मंदिर सुंदर आहे . 





अप्सरा तलाव ----


    अजून अनेक monuments या किल्ल्यावर आहेत , आंग्रे वाडा , नानीबाई आंग्रे चा वाडा (कान्होजी आंग्रेंच्या विधवा), तळघर , मुख्य कार्यालये , इत्यादी । 
 
किल्ल्ल्यावरून दिसणारे  दृश्य :
 

 
 

 सध्या किल्ल्याच्या डागडुजी ची जबाबदारी Archaelogical Survey of India (ASI) घेत आहेत त्यामुळे प्रवेश फी भरावी लागते :) त्यातल्या त्यात भारतीयांसाठी कमी आहे (५ रु) …परकीय नागरिकांसाठी फी (१००  रु) 
पण हे मानावे लागेल कि किल्ला बर्यापिकी सुस्थितीत आहे … 

 परत येताना घोडागाडी करायचे ठरवले …. परत किनार्यावर येउन बसलो तेव्हा सूर्यास्त होत होता … वाह काय सुंदर दिसत होते दृश्य  







शांत सुंदर सज्जनगड …

1 comment:
शांत सुंदर सज्जनगड …

सज्जनगडाला जायला फक्त निमित्त लागते , केव्हाही जायला आम्ही तयार असतो . कॉलेज मध्ये असताना २ -३ फेऱ्या झाल्या असतील … संत रामदास स्वामींची समाधी आणि हे येथील मुख्य आकर्षण , सज्जनगड चा अर्थच "चांगल्या लोकांचा गड" आहे.

शिवाजी महाराजांचे गुरु असलेले रामदास स्वामी येथे वास्तव्य करत होते , तेव्हापासून सुरु असलेले रामदास स्वामी संस्थान आजपर्यंत अस्तित्वात आहे. गडावरची शिस्त वाखाणण्याजोगी आहे . खरच …

इसवी सन १७०० मध्ये जेव्हा औरंगजेबाने हा गड ताब्यात घेतला तेव्हा या गडाचे त्याने "नवरसातारा" असे ठेवले होते तरी रामदासांनी ठेवलेले सज्जनगड हेच नाव प्रसिद्ध झाले :)

स्वारगेट वरून सातारा एस टी प्रवास आणि साताऱ्या वरून थेट सज्जनगडाच्या पायथ्याशी एस टी उपलब्ध आहे . पायथ्यावरून दिसणारे घाटातले दृश्य खूप सुंदर आहे. विशेषत: पावसाळ्यात …

इथून १५ - २० मिनिटे पायऱ्या चढून गेल्यावर शिवाजी महाराज प्रवेशद्वार लागेल . अजून पायऱ्या चढून गेल्यावर श्री समर्थ महाद्वार आहे .

उजव्या बाजूने गेल्यावर सोनाळे तळे दिसते, ज्याचे पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे :) :) या तळ्याच्या थोडे आजूबाजूला भटकल्यास उपहारगृह , धर्मशाळा दिसेल

थोडे चालून गेल्यावर रामदास स्वामींचा मठ दृष्टीस पडतो(अशोकवन) या मठामध्ये शिस्त म्हणजे शिस्त . रोजचे वेळापत्रक ठरलेले आहे. पूजा, नैवेद्य, आरती, मनाचे श्लोक पठन आणि मग जेवण. शुद्ध सात्विक जेवण सर्वांसाठी उपलब्ध असते. आपल्या हाताने ताट वाटी घेऊन जेवण झाल्यावर व्यवस्थित परत ठेवून द्यायची हात तिथला नियम जो आपण घरी कधी पाळला नसला तरी इथे आपोआप पाळला जातो (वातावरणच तसे असते ) :) :) :)

मठाच्या मागील बाजूस नूतन प्रवेशद्वारातून आत गेल्यावर राम मंदिर आहे ज्या मंदिरात वरील बाजूस रामाचे मंदिर आणि त्याच्या बरोबर खाली समाधी स्थान आहे.

या समाधी स्थानात प्रवेश केल्यावर आपली बडबड , डोक्यातले वेगवेगळे विचार , गोंधळ आपोआप बाजूला पडतो एवढी शांतता येथे असते , असा अनुभव आजपर्यंत मी घेतलेला नाही. समाधी स्थानाचे महत्व तेव्हा आपल्या लक्षात येते…

संस्थानाचे कार्यालय इत्यादी पार केल्यावर मागील बाजूस सुंदर पठार आहे. हिरवळी वरुन चालताना अतिशय प्रसन्न वाटते. धाब्याचे मारुती मंदीर एका टोकाला आहे जेथून पुढे उरमोदी धरणाचा सुंदर नजारा दिसतो. कॅमेरा एक क्षण सुद्धा स्वस्थ बसणार नाही ….

ठोसेघर च्या धबधब्याचा आवाज सुद्धा इथे ऐकू येतो एवढी शांतता येथे आहे. बरेच असे सुंदर स्पॉट येथे आहेत जे शब्दात सांगण्यापेक्षा तुम्ही खालील फोटोंमध्येच बघा :) :) :)

कसे पोहचाल: पुण्यावरून सातारा एस टी मिळू शकते आणि साताऱ्या वरून थेट सज्जनगड एस ती उपलब्ध आहेत.

खाण्याची सुविधा : समर्थ रामदास मंडळा तर्फे मोफत जेवण असते दुपारी एका ठराविक वेळात , अन्यथा उपहारगृह आहेच :) पायथ्याशी काही टपऱ्या आहेत …

राहण्याची सुविधा : समर्थ रामदास मंडळा तर्फे मोफत राहण्याची सोय सुद्धा आहे .

फोटो :-




 
 


गडाच्या पायथ्याशी …   दरी मधले दृश्य  









 





धाब्याचा मारुती ।
 




 














 

हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - एक आव्हान

8 comments:
सह्यपर्वताच्या अधिपत्यात असणाऱ्या आणि ट्रेकर्सचा स्वर्ग समजला जाणारया  हरिश्चंद्रगडावर बरेचदा जाणं झालं ते खिरेश्वर मार्गे.नेहमीच भुरळ पाडणाऱ्या  कोंकण कड्याच्या बाजूला रात्री राहण्याची आणि खालून कोंकण कडा पाहण्याची इच्छा अजूनही इछाच होती. आणि कोंकणातल्या बेलपाडा गावातून नळीची वाट साद घालत होती.नळीच्या वाटेबद्दल खूप काही ऐकून होतो. बराच कठीण आहे,भरपूर रॉक पचेस आहेत,बहुतेक ठिकाणी खडी चढण आहे,चढायला रोप ची गरज लागते,वगैरे वगैरे.आधी एकदा प्लान केला होता जाण्याचा,पण काही कारणास्तव तो फसला आणि जमलेच नाही. यावेळी मात्र नळीच्या वाटेचं आव्हान काहीही झाल्या पेलायचं आम्ही ठरवलं होतं. येणारया शुक्रवारला रात्री निघायचं ठरलं.

गुरुवारी रात्री प्रसन्नाचा चा मेसेज आला "प्रसादचं आणि माझं नाही जमणार यायला",झालं.गळणाऱ्याच्या संख्येत आणखी दोघांची भर. आधीच ऋषी आणि वासू चं रद्द झालेलं. अतुल आणि सागरचं चाललेलं यायचं पण ऑफिस च्या वेळेमुळे त्याचं पण रद्द झालेलं. आता राहिलो होतो चौघं केसागर,इंद्रा,निखिल आणि मी. कमीत कमी चार जण तरी जाऊ शकतो ना ? या गोड विचारांनी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी केसागर ला काल केला तर पठ्ठ्या कॉलेजची शेवटची ग्यादरिंग असल्यामुळे जावं लागणार म्हणून काहीतरी बडबडत होता. ऐनवेळी हा माणूस टांग देण्याचा प्रयत्न करत होता . मी ओळखलं "अजून एक पान गळणार " .आणि फोन संपेपर्यंत गळालं सुद्धा. राहिलो तिघेच. 


प्रसादला फोन केला, त्यानी "हडसर-जीवधन-नाणेघाट-चावंड" हा ट्रेक सुचवला. जायला हरकत नव्हती,पण नळीच्या वाटेचा विचार आणि खूप दिवसांपासून रखडलेला ट्रेक पूर्ण करायचं स्वप्न यामुळे दुसरं काही सुचत नव्हतं. ठरवलं. आता आपण तिघेच हा ट्रेक करायचा.निखिलला पातेलं,टेंट वगैरे घेऊन संध्याकाळी साडेसहापर्यंत स्वारगेटला यायला सांगितलं. इंद्र पण तिथेच पोहोचणार होता. 

ठरल्याप्रमाणे मी ऑफिस मधुन लवकर निघालो. घरी येताना वाटेतच मामाजींचा फोन आला,"तुझं विद्यापीठातून पत्र आलंय,उद्या पदवीप्रदान समारंभ आहे." झालं,अजून एक संकट. लगेच इंद्राला सांगणार तेवढ्यात  विचार केला आधी पाहावं तर पत्र काय आहे ते ? घरी पोहोचलो,पत्रं पाहिलं. समारंभाला न जाता पदवी पोस्टाने घरी येण्याची खात्री पटली. ते सगळं बाजूला सारून sack भरायला सुरुवात केली. मामाजीचं चाललं होतं " अरे जाऊन ये,ट्रेक करायला काय सगळं आयुष्य पडलंय. पदवी हातात घेऊन फोटो काढण्याची संधी गमावशील." पण या फोटो पेक्षा मला नळीच्या वाटेच्या फोटोची भुरळ पडली होती. जाऊ दे. ट्रेकला जायचा निर्धार अजुन पक्का झाला.

व्हायचा तो उशीर झाला आणि सगळ्यांना स्वारगेटला जमायला सात-साढे सात झाले. चौकशी केल्यावर कळाले बस साढेंआठला आहे. वाट बघत बसलो. बस आली साढे नऊला. बस मध्ये बसल्यावर कळलं,बस "खोपोली मार्गे जाणार आहे" बोंबा. आम्हाला जायचं होतं माळशेज घाटमार्गे. डेक्कनला उतरून शिवाजीनगरला गेलो आणि नाशिकच्या बस मध्ये बसुन आळे फाट्याला उतरलो. रात्रीचे बारा-सव्वा बारा झाले असतील. सगळीकडे सामसूम. सरत्या हिवाळ्याची थंडी जाणवत होती.आम्ही कल्याण रोडला येऊन थांबलो. बॉटल काढायला हात पाठीमागे टाकला तर बस मधला येतानाचा प्रसंग आठवला.
बस मध्ये एकाने माझ्याकडे पाण्याची बाटली बघून प्यायला पाणी मागितले. सहप्रवासीधर्म म्हणून मी त्याला बाटली दिली. स्वतः तर पाणी कधी न पिल्यासारखा चांगली अर्ध्यापेक्षा जास्त खाली केली. आणि वरून कहर म्हणजे त्याच्या मित्रांना प्याऊ सुरु केल्यासारखं पाणी पाजून बुडाला लागलेली बाटली परत केली. म्हटलं "धन्यवाद ,आभारी आहे ". आता याला काय म्हणावं ? म्हणजे "एखाद्याला खायला ऊस द्यावा आणि त्याने तो मुळासकट उपटून खावा " अशीच अवस्था झाली होती.
अर्थात दोघांकडच पाणी  आधीच संपलं असल्यामुळे आम्हाला पाणी शोधणं गरजेचं होतं. आजुबाजुला कुठे चहाची टपरी पण नव्हती. तेवढ्यात दोघे वयस्कर माणसे बस चीच वाट पाहत असताना दिसले. त्यांना बस बद्दल विचारलं. तर बीड-कल्याण बसची वेळ झालेली आहे येईल इतक्यात असं समजलं. बस येईपर्यंत पाणी भरायला आळेफाट्याच्या स्थानकावर गेलो तोच त्या माणसांनी बस आलीये म्हणून ओरडायला सुरुवात केली. अर्धवट पाणी भरून बस मध्ये बसलो.

आम्हाला उतरायचं होतं सावर्णे या गावी. एक तर या गावाचं ठिकाण,स्वारगेट बस स्थानकावर कंडक्टर पासून डेपो मनेजर पर्यंत कुणालाच धड सांगता येत नव्हतं. त्यामुळे गावात व्यवस्थित बस स्थानक असेल याची दाट शक्यता नव्हती. आणि वरून या कंडक्टर ला पण माहित असेल की नाही याची भीती होती. कंडक्टरला सावर्णेचं  तिकीट मागितलं. "कुठे आलं ते ?",कंडक्टर उत्तरला. बोंबल,ह्याला पण माहित नव्हतं. ज्या गोष्टीची भीती होती, तेच झालंय."माळशेज घाट संपायच्या थोडसं अलीकडे. ",मी बोललो. इंद्रा आणि निखिल मागे बसले होते. "गाडी थांबत नाही",कंडक्टरची प्रतिक्रिया.मी विनवणी करत होतो. कंडक्टर मोठ्याने ओरडला,"रात्री घाटात गाडी थांबणार नाही". माणूस ऐकालाच तयार नव्हता. ओतूरला उतरलो. रात्रीचे दीड-दोन वाजले असावेत. आता सूर्योदयाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दिली ताणून बस स्थानकावर.

सकाळी चार-साढे चारला उठलो. गडबडीत आवरलं आणि सकाळची पहिली बस पकडायची म्हणून कल्याण रोडला येउन थांबलो. आजूबाजूला काळं कुत्रं सुद्धा नव्हतं दिसत. रात्रभर भुंकणारं पण नेमकं यावेळेस साखरझोपेत असावं कदाचित कारण त्याचाही आवाज बंद झालेला . आणि आम्ही भटके बस ची वाट पाहत भूतासारखे रस्त्यात उभे होतो. पाच वाजले ,सहा झाले तरी बस चा पत्ता नाही,आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबायलाच तयार नव्हत्या. वैतागुन एका उघडलेल्या टपरीवर चहा घेतला आणि परत काही मिळतं का याची वाट पाहत रस्त्यावर येउन थांबलो. आणि शेवटी एकदाची एका माणसाने त्याची क्रुझर थांबवली आणि माळशेज घाटातुन आमचा प्रवास सुरु झाला. इंद्रा आणि निखिलनी तर बसल्या बसल्या ताणुन दिली. मी जागा होतो. ड्राईवर म्हटला तर खरा,पण त्याला पण सावर्णे गावाची माहिती असेल की नाही यात शंका होती.

सहयपर्वताची मुख्य रांग कापत गाडीने घाट उतरायला सुरुवात केली आणि दक्षिणेस  डाव्या बाजूला भैरवगडाच्या कातळ भिंतीने आणि नानाच्या अंगठ्याने लक्ष वेधून घेतले. उजव्या बाजूला(उत्तरेकडे) नाफत्याचे उंचच उंच कडे,हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या रोहिदासाचे शिखर यांचं दर्शन झालं. दोहोंच्या मधल्या कोंकण कड्याने जणू काही तुमचीच वाट बघतोय अशा अविर्भावात दुरून हातवारे केल्यासारखं जाणवलं. हे बघण्याच्या नादात आम्ही पार मोरोशी जवळ येऊन पोहोचलो.प्रसादनी सांगितल्यानुसार मध्ये एक पोलिस चौकी लागते,त्याच्या अलीकडे थांबायचं होतं. बोलण्याच्या नादात ड्रायव्हरला पण नाही कळलं.
जवळपास १० किमी पुढे आलो होतो. तेथून वालीवरेला जायला रस्ता दिसत होता,पण ते अंतर बरंच असल्यामुळे तसंच परत एका ट्रकमध्ये बसुन सावर्णे चा प्रवास सुरु झाला. सकाळचा मंद वारा ती सकाळ अतिप्रसन्न करण्यास समर्थ होता. भैरव गडाच्या कातळकड्याचे परत दर्शन होताच,गडाला भेट देण्याची इच्छा अजून तीव्र होत चालली होती. माळशेज घाटचा दृष्ट लागण्यासारखा रस्ता न्याहाळत आम्ही ट्रक मधल्या प्रवासाचा आनंद घेत होतो.  रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांचा पालापाचोळा वाऱ्या मुळे इकडे-तिकडे उडत होता. हा प्रकार बघत बघत आम्ही सावर्णे गावाजवळ येउन पोहोचलो.

सकाळचे साधारण सात सव्वा-सात झाले असतील. पैसे देताना ट्रक ड्रायव्हर विचारता झाला, "इकडे कुठं भटकले?" आम्ही त्याला बोट दाखवुन म्हटलं,"तो जो डोंगर दिसतोय ना!, हा तो! चढून जाणार आहे आम्ही."कमाल हाये बा तुमची!",डोक्याला हात लावुन ड्रायव्हर पुटपुटला. त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकत आम्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन बसलो. चहा घेऊन हुशार झालो आणि बेलपाड्याकडे चालत निघालो.

दहा बारा घरांची वस्ती असलेलं सावर्णे गाव. सकाळची वेळ असल्यामुळे बायाबापडयांची कामे चाललेली. त्यातली काही जण आमच्याकडे आश्चर्याने पाहत होती. रस्ता विचारून पुढे निघालो.मला नेहमी विचार पडतो,"या गावकर्यांना आम्हा भटक्याबद्दल काय वाटत असेल?" म्हणजे,"उगाच हे डोंगर चढून या लोकांना काय मिळत असेल",असाच विचार करत असतील,नाही? एका आजोबाला वाट विचारून आम्ही बेलपाड्याच्या खिंडीकडे चालायला सुरुवात केली. वाटेत लागणारा ओढा पार करून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर आम्ही खिंडीजवळ येउन पोहोचलो. खिंडीतून नाफ्त्याचा कडा अजूनच भीषण वाटत होता. थोडा वेळ शांत बसुन आसमंत न्याहाळला.खिंड उतरायला सुरुवात केली.खाली उतरून शेत-शिवाराच्या दांडाला लागलो. वसंताची चाहूल लागल्यामुळे आंब्याच्या,जांभळा-करवंदाच्या झाडांना मोहोर यायला सुरुवात झाली होती. असंच एका आंब्याच्या बागेतून जाताना मोहरलेल्या झाडांनी मन मोहरून टाकले.



एका तासात आम्ही बेलपाड्याला पोहोचलो.आणि वालीवारे म्हणजेच बेलपाडा होय, हे तेव्हा कळलं. मध्ये एक नदी,ओढा लागला. नदीवरचा सांकव ओलांडुन पलीकडे गेलो तर,विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायाबापड्या आमच्याकडे बघत लाजऱ्याबुजऱ्या झाल्या. "आता हे ध्यान कुठून आलं म्हणावं?" असाच विचार कदाचित ते आमच्याबद्दल करत असतील. त्यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि गावातल्या मुख्य रस्त्यावरून चालत,दोन तीन शेत-शिवार पार करून नाळेच्या तोंडाशी म्हणजे मघाच्या नदीच्या उगमा जवळ येउन पोहोचलो. नदीचं नाव काळू नदी. नळीच्या वाटेच्या पाण्यानी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारी.आता थोडेफार पाणी होते.नदी बाजूला ठेवून आम्ही नळीच्या वाटेकडे चालायला लागलो.

अरे बापरे ! समोर नाफ्ता,कोंकण कडा आणि रोहिदास शिखर. आम्हा भटक्यांची वाचा बंद. म्हणजे याला काय म्हणावं सुचत नव्हतं. निसर्गाने जणु सह्यापर्वताचा आकाशाला भिडणारा उंचच उंच बांधुन तयार ठेवलेला मंच. जवळपास समुद्रसपाटीच्या उंचीवरून अजूनच अक्राळ विक्राळ वाटत होता.सकाळच्या पहिल्या सुर्यकिरणांना देखील आपल्यापर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागावा,इतका तो उंच आणि पसरलेला उभा कातळकडा.वाह ! रात्रीच्या जागरणाच चीज इथेच झालं असं वाटायला लागलं.


दाट जंगलातुन वाटा काढत आम्ही नाळ गाठायला सुरवात केली. मध्ये एक झोपडी दिसली.आजूबाजूला शेत केल्यासारखी जागा होती. जाऊन पाहिलं तर एका आजोबांची भेट झाली. मनात विचार आला, पुढच्या वेळेस आलो तर झोपडीच्या बाजूला राहण्याचा मस्त बेत होईल. आजोबांना रस्ता विचारला तर त्यांनी हातातला विळा रोखून वाट दाखवली. "अहो आजोबा,इथे सात-आठ जणांची राहण्याची सोय होईल का ?",मी विचारलं. "पन्नास येऊ दे." ऑ! आजोबांच्या उत्तराने सुखावलो आणि परत आमची भटकंती चालू झाली.  थोड्याच वेळात दगड धोंडे सुरु झाले म्हणजेच नाळ सुरु झाली.

उजव्या बाजूला भीषण कोंकण कडा. त्यामागून सुर्यनारायण उगवत तापायला सुरुवात झाली होती. कोंकण कडा आणि रोहिदास यांच्या मधल्या खाचेतून सूर्यकिरणे डोकावत होती. जणू काही सह्यकड्याचा आणि सूर्यकिरणाचा लपंडाव चाललेला आहे असं भासत होतं. निसर्गाच्या या निरागस खेळाचा आनंद घेत आम्ही नाळेतून चालत होतो. मोठ-मोठे दगड चढताना बोराटाच्या नाळेची आठवण येणार नाही असे कसे होणार. पण यावेळेस आम्ही नाळ चढत होतो. 

अर्ध्या-पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही नाळेच्या मुख्य तोंडाशी म्हणजे खरंतर जेथून घसरड्या दगडांचा रस्ता चालू होतो तिथे येउन पोहोचलो. अंतर जास्त वाटत नव्हतं,मनात विचार आला एक दोन तासात चढून होईल,लोकांनी इतका का बाऊ करून ठेवलाय या वाटेचा ? कळत नाही. पण लगेच थोडं पुढे चढत गेलो आणि भ्रमनिरास झाला, कळाले आम्हाला,इथे येणारे बरोबर बोलतात!

खरी कसोटी येथुन लागणार होती. इंटरनेट वर तसं बरंच पारायण करून आलो होतो. त्यामुळे नाळेत वर चढेपर्यंत किती रॉक पचेस आहेत यांची इत्यंभूत सगळी माहिती होती. सह्याद्रीच ते भीषण,रौद्र निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही पहिल्या खडकाच्या कठीण तुकड्या(रॉक प्याच) पर्यंत पोहोचलो.तो भाग सहज पार करत पुढे निघालो. पहिला भाग पार केला खरा पण जवळचे सगळे पाणी संपले होते.पुढे चालत राहिलो. ऊन वाढत होतं,तोंड सुकली होती,घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात पुढच्या रॉक प्याचला दोघे-तिघे जण बसले होते. त्यांनी प्यायला पाणी दिले,जीव भांड्यात पडला. तिथे भास्कर ची ओळख झाली. भास्कर - म्हणजे कोंकण कड्याचा मालक :) हा हा! निदान आम्हाला तरी तो कोंकण कड्याचा मालकच वाटतो निखिल पुढे दुसरा प्याच चढून आमची वाट बघत बसला होता. भास्करच्या माहितीनुसार आता कोंकण कडा येईपर्यंत पाण्याचा दुष्काळ.थोडा वेळ शांत बसलो, नाळेच निरीक्षण करत. अप्रतिम म्हणजे चाबुक,महादेवाने तांडव करावा तसं निसर्गाने अक्षरशः तांडव मांडला होता. पण तांडव मात्र शांत वाटत होता.सह्याद्रीचे ते उंचच उंच कडे जणू काही चाकूने तुकडे केलेल्या केकचे चिरे भासत होते. आणि ते उंच कातळ-कडे आता आकाशाला भिडतात कि काय असं वाटायला लागतं.निसर्गाच्या सादेला हाक देत आम्ही दुसरा खडतर भाग चढून पुढे निघालो. 




आणि आता तर निसर्गाने  काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं आमच्या ताटात. तिसरा रॉक प्याच यायच्या आधीच ही खडतर वाट! या वाटेवरून चालायचे/चढायचे म्हणजे अधे मध्ये थांबणे नाही. थांबला तो संपला. थांबला तर ज्या दगडांना तुम्ही धरलंय तो दगड एकतर हातात येईल,नाहीतर ज्या दगडावर थांबलाय तो तरी घसरून खाली पडेल. याचा अर्थ तुमचा तोल जाऊन तुम्ही खोल दरीमध्ये पडू शकता. ही वाट पार करून तिसऱ्या रॉक प्याच च्या तोंडाशी येऊन पोहोचलो. याला मुळीचा प्याच असेही म्हणतात. हा प्याच थोडा ट्रिकी असुन चढायला रोपची मदत लागती. आधीच एका टीमने रोप बांधला असल्यामुळे,आम्ही आमच्या रोप चे उत्घाटन न करता त्याच रोपने वर चढलो. त्यानंतर मोठ्या खडकाला वळसा घालून एक धोकादायक ट्रवर्स पार केला. ट्रवर्स पार करताना खोल दरीची भीषणता जाणवत होती. पण आता थोडीफार सवय झाल्यामुळे लगेच पार करून खिंडीत येऊन पोहोचलो. नळीची वाट संपली. हायसे वाटले. 


धन्यवाद - आभारी आहे 
याचा पुढचा भाग हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा 

कुंडली - कामशेत - कोंडेश्वर मंदिर

4 comments:
या ठिकाणाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.  एक छान अनुभव तुम्हाला पण
घेता यावा यासाठी मी  हा लेख लिहत आहे. कामशेत येथून आतमध्ये २० - २५   किमी वर हे मंदिर आहे.


कामशेत ला पोहचल्यावर जांभिवली गाव किंवा कुंडली रोड ने जा. जांभिवली गावाला पोहचल्यावर तेथील स्थानिक लोकांना कोंडेश्वर  मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारा. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे म्हणजे स्वर्गच…






  





साधारण २ किमी चा हा रस्ता कधी शेतातून तर कधी खडकातून आहे. कही अन्तर पार केल्यावर खलील सूचना
फलक दिसेल(म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात)



पुढे गेल्यावर मंदिर दिसेल , दुरूनच दिसणारे मंदिराचे दृष्ट अतिशय नयनरम्य आहे . शंकराचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे.




आजूबाजूला डोंगर, धबधबे आणि मध्ये केंद्रस्थानी हे मंदिर :)
महाशिवरात्री ला येथे प्रचंड गर्दी असल्याचे स्थानिक लोक सांगत होते.







मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो , खडकांचा एक वर जाणारा रस्ता आम्हाला दिसला …असेच वर जाऊन पहिली,  डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे द्रुश्य । एक मोठा धबधबा (रुंदीने मोठा) आमची वाट पाहत होता. आणि विशेष म्हणजे त्या धबधब्यात कोणीच नव्हते :) कोणीच नाही …मला भुशी धरणावरच्या धबधब्याची आठवण झाली(गर्दीची) :)    १ तास आम्ही तिथे भिजलो ....


खाण्याची  सुविधा :- आम्ही गेलो तेव्हा तिथे एकच टपरी होती जिथे चहा ,पोहे , वडा पाव सारख्या बेसिक गोष्टी मिळत होत्या. किंमत नेहमीपेक्षा जास्त आहे (साहजिकच)  पण उपलब्ध  आहे…:)

स्वता:चे वाहन असेल तर तुमही जांभिवली गावापर्यंत आरामात जाऊ शकता.
एस टी महामंडळाची बस पण इथे येते पण कधी ते माहित नाही :)

जवळची ठिकाणे :- शिरोटा आणि उकसन धरण, राजमाची  ,ढाक भैरी





                          Kondeshwar Temple, Kundli(Kamshet)


Finally I am writing this article. This is about one unexplored place. Most of the people are not aware about this place, kondeshwar temple. It is about 20-25kms from kamshet. This temple is surrounded with the fabulous scenary.
In rainy days, it is worth to visit once. We had been there in august so that we can catch waterfalls :) This temple is dedicated to Lord shiva.
Temple is loaded healvily on mahashivratri by Shivbhakt :)
How to reach: - when you reach kamshet, ask for the road to go to Jambivli village. In below map you can see the route as “kamshet kundli road”

Once you reach jambivli, you can ask local people about kondeshwar temple...it is around 2-3 kms walk and its beautiful route J through farms.
After visiting temple we hiked through small rock patch and after that we could not believe on our eyes,
One big waterfall (not by height but by width) was waiting for us... Nobody was there, we enjoyed the waterfall for an hour……everybody was slipping from the wet rocks below water but doesn’t matter we came to enjoy so we enjoyed a lot there.

 
Facilities:

That time only one small tapri was there where you can get tea, vada pav , ofcourse price is quite more than usual J but no option, otherwise bring food with you…
You need to have your own vehicle to reach jambivli village but walk till temple is must (in rainy days) and worth it :)
ST bus is also there but you never know when it will come  :)

Places nearby:
Dhak bahiri, uksan dam , shirota dam.